Sunday, July 4, 2010

निरुत्तर

वाट बघण्याच्या क्षणांची यातना कळली पुन्हा
डोह भरले पापण्यांचे, माळ ओघळली पुन्हा
तो म्हणे, "ही  वाट माझी वेगळी, अगदी नवी"
लोक आले, येत गेले, वाट ती मळली पुन्हा
कैकदा ठरवून झाले जायचे नाही तरी,
का तुझ्या रस्त्याकडे ही पाउले वळली पुन्हा?
मी उमेदीने नव्या  फुलता जरा चैत्रापरी,
पेटला वैशाख वणवा, बाग का जळली पुन्हा?
वादळे आली किती, त्यांची मला नव्हती तमा,
बांधले घरटे तिथे का वीज कोसळली पुन्हा?
 कोरड्या डोळ्यापरी का कोरडे झाले ऋतू?
मी असे पुसता निरुत्तर सांज मावळली पुन्हा!

6 comments:

  1. सुंदर !!! खुपच छान..

    ReplyDelete
  2. वादळे आली किती, त्यांची मला नव्हती तमा,
    बांधले घरटे तिथे का वीज कोसळली पुन्हा?

    mastch ...

    ReplyDelete
  3. छान आहे कविता.

    ReplyDelete
  4. क्रांती ...इतक सही कस लिहितेस ग तू ?

    ReplyDelete