Saturday, September 10, 2011

शून्य

म्हणायला जगणे होते पण जागोजागी मरणे होती
मरणानंतर एक तरी, जगताना लाखो सरणे होती

नदी कधीही सुसाटून वाहिलीच नाही मुक्तपणाने
तिच्याभोवती कायम दारे, भिंती, बांध नि धरणे होती

जीवनात जे जे घडले ते नव्हते कौतुक करण्याजोगे,
पूर्वसुरींच्या वाटांची ती फक्त अंध अनुकरणे होती

अशी संहिता लिहिली त्याने, सुधारणेला जागा नव्हती
टिंबांनी संवाद साधला, रिकामीच अवतरणे होती

अवतीभवती कुणीच नव्हते, तरी कधी नव्हते एकाकी,
हरेक अवघड वळणावरती सोबत हळवी स्मरणे होती

काय कशातुन उणे करावे? क्षणही नाही जमेस आता,
शून्य शेवटी हाती आले, चुकलेली समिकरणे होती!

1 comment: