Wednesday, January 18, 2012

समजायचेच आहे

बदलायची दिशा की बदलून जायचे हे समजायचेच आहे 
हरवून जायचे की हलवून जायचे हे समजायचेच आहे 

सहजीच भेटलेल्या गुलजार मोहराचे कळती जरी इशारे,
बहरास टाळुनी की बहरून जायचे हे समजायचेच आहे

अजुनी कधी कधी या वळणावरून येते प्रतिबिंब चांदण्यांचे,
कवळून घ्यायचे की उधळून जायचे हे समजायचेच आहे

अलवार भावनांचे हळुवार गीत गाते अलगूज ओळखीचे
कुठल्या सुरात केव्हा हरवून जायचे हे समजायचेच आहे

सृजने चितारणारे अनमोल रंगठेवे मिळती कुणाकुणाला,
मिटवून जायचे की सजवून जायचे हे समजायचेच आहे

इथुनीच एक जाते म्हणतात वाट त्याच्या गुलमोहरातळाशी
तुडवायचे तिला की वगळून जायचे हे समजायचेच आहे 

2 comments:

  1. गझल आवडली.
    "अलवार भावनांचे....." हा शेर सगळ्यात छान वाटला.

    ReplyDelete
  2. खुप सुंदर...रोज येउन तुझ्या प्रत्येक कविता वाचायच्या हेच ठरवले आहे..खुप सुंदर लिहितेस तु क्रांती.ः)

    ReplyDelete