Thursday, March 29, 2012

नि:संग

सांग माझ्या दैवात काय आहे?
गूढ जन्माला घेरुनीच राहे 
घालते मी नौकेस ज्या प्रवाही, 
तो क्षणी का भलत्या दिशेस वाहे?

व्यक्त होताहोताच मूक होते 
तोल गेला की जागरूक होते 
काळजाचे तुटतात बंध तेव्हा 
जाण येते कोठून चूक होते

कोण आकांक्षा, कोणती अपेक्षा ?
या जिवा ठावी वंचना, उपेक्षा
मी अखेरी समजावते मनाला
लाभले ना काहीतरी नपेक्षा?

थोर काव्ये दु:खात जन्म घेती
अन् व्यथेलाही गूढ अर्थ देती
यातनांशी संधान सर्जनाचे
वेदनेच्या मागून शब्द येती

याचसाठी ही वेदना दिली का?
दु:ख लेण्याची प्रेरणा दिली का?
की निराळे काहीतरी कराया
जीवघेणी संवेदना दिली का?

सोसण्याचा हा हट्ट कशासाठी?
सोडताना उरणार काय पाठी?
या विचारांचे बंध उकलताना
आणखी का कसतात नीरगाठी ?

अक्षरांचे होतात फास तेव्हा
शब्द घेती अंतीम श्वास तेव्हा
मीच जावे लंघून प्राण माझे
राहतो हा अस्वस्थ ध्यास तेव्हा

चेतना ना चित्ती न प्राण देही
आणि हरवुन जातात स्पंदनेही
त्या क्षणी मी नि:संग का न व्हावे?
का न तोडावी व्यर्थ बंधने ही ?

3 comments: