Saturday, May 12, 2012

सांगता

व्याकूळ होणे स्वभावात नाही, अशांना व्यथा आठवाव्यात का?
आनंदरागावलीच्या स्वरांनी विराण्या उगा आळवाव्यात का?
झाकोळलेल्या जरी पायवाटा, कुणी चालणे सांग सोडेल का?
नाते फुलांचे गळा फास झाले तरी दैव ते बंध मोडेल का?

तू लाखदा माग, साऱ्या अपेक्षा कधी पूर्ण होतात का या जगी?
जाणूनही वेड का पांघरावे, निराशेत गुंतून जावे उगी?
धारेत झोकून द्यावे मनाला प्रवाहातल्या ओंडक्यासारखे 
वाहील तेथे खुशालीत राहो, नको दु:ख त्याचे खुळ्यासारखे

लाभेल केव्हा किनारा, कशाला तुला व्यर्थ चिंता, बुडे वा तरे
वाळूत बांधून झाली कितीदा, पुन्हा लाट वाहून नेई घरे 
आकांत वेड्यापिशा भावनांचा विरू दे, झरू दे जरा शांतता 
तेव्हाच यात्रा पुरी व्हायची, या प्रवासास ना तोवरी सांगता

1 comment:

  1. "तू लाखदा माग, साऱ्या अपेक्षा कधी पूर्ण होतात का या जगी?
    जाणूनही वेड का पांघरावे, निराशेत गुंतून जावे उगी?
    धारेत झोकून द्यावे मनाला प्रवाहातल्या ओंडक्यासारखे
    वाहील तेथे खुशालीत राहो, नको दु:ख त्याचे खुळ्यासारखे"

    अगदी खरय ताई.

    ReplyDelete