Tuesday, September 4, 2012

वाट विसरली

सुस्तावून पसरले अंबर 
धुके पांघरुन निजले डोंगर 
किरण विसरले प्रभातफेरी,
सूर्य म्हणाला, 'जाऊ नंतर!'

वारा लावुन बसे समाधी
हले-डुलेना एक पानही
पंख लपेटुन निवांत पक्षी
ना कुजबुज, ना समुहगानही

कळ्या-फुलेही अजुन निजेतच
दंव थिजले की टपोर मोती?
मुग्ध, विलक्षण गूढ शांतता
निळ्या, नितळशा तळ्यासभोती

दिशा गोठल्या, उन्हे न झरली
कुडकुडत्या हिरव्या पात्यांवर
रात घराची वाट विसरली,
रेंगाळत डोंगरमाथ्यांवर 

1 comment: