Monday, August 5, 2013

अलख

नकोसे वाटे हे समर, दुबळा जीव थकला
दिशांच्या गर्भाशी तम वितळले, सूर्य झुकला
जराशा श्वासाने मरण सरले, दु:ख उरले
हवी होती मुक्ती, क्षण निसटला, नेम हुकला

निळ्या डोहाकाठी गळुन पडले पंख इवले
तरंगांच्या ओठी शिशिरहळवे गीत दबले
कुणा पाकोळीचा करुण भिजला आर्त स्वर तो
भुलावा होता की पुसट चकवा हे न कळले

फकीराचा यावा अलख घुमता ती गहनता
भरे संध्याकाळी गगन तमरंगात ढळता
तिथे माझी काया सरण नसुनी मूक जळते
तुझी गीते गाती सजल नयनांची विकलता


[वृत्त -शिखरिणी]

1 comment: