Tuesday, February 26, 2013

रेशिमगाठी

ती व्याकुळ होउन गाते 
भावार्त, निरागस गाणी तरुण व्यथांची 
अन् मनस्मरणीवर जपते                     
विस्मरली नावे विरलेल्या शपथांची 

ती केविलवाणे हसते
भरल्या डोळ्यांच्या रित्या करून पखाली 
दंव जसे फिकटते, विरते 
सुकतात आसवे तशीच थबकुन गाली 

ती अलिप्त होउन लिहिते 
कधि तिचीच असुनी नसते अशी कहाणी 
वाचून मनाशी म्हणते,
'इतकी अगतिक का असते कुणी दिवाणी?'

भिरभिरत एकटी फिरते 
भंगून विखुरल्या स्वप्नांच्या वाटांनी 
फिरफिरुन रोज सावरते 
घरकूल कैकदा विस्कटले लाटांनी 

मुखवटे कितीक घडविते 
लावून वर्ख ती फसव्या हास्यासाठी 
हट्टाने बांधत बसते 
तुटल्या नात्यांच्या सुटल्या रेशिमगाठी 

Tuesday, February 19, 2013

बघत राहिलो धूळ

कवि गोपालदास 'नीरज' यांच्या एका अतिशय गाजलेल्या कवितेचा अनुवाद करण्याचा माझा प्रयत्न. ही कविता 'नई उमर की नई फसल' या चित्रपटात गीत म्हणून घेतली आहे.

सुकली, गळली स्वप्नफुले अन् सखे बोचरे काटे 
बाग पारखी सौंदर्याला, बाभुळबन हे वाटे 
खुळ्यासारखी घेत राहिलो बहराची चाहूल 
निघून गेले कधीच तांडे, बघत राहिलो धूळ ||

सरली नव्हती नीज अजुन तरि ऊन शिरावर आले 
पाउल उचलत होतो, जीवन निसटून दूर पळाले
फांदी फांदी जळून गेली, पान न् पान गळाले
सरला जन्म तरी ना काही मनासारखे झाले
*****
अश्रू झाले गीतांचे, स्वप्नांची झाली थडगी
मालवून गेल्या ज्योतीही करुन धुराशी सलगी
वळणावर अगतिकसा थांबुन, गलितगात्र अन् जर्जर, वाकुन
चढत्या आयुष्याची उतरण पहात मी व्याकूळ ||

पाहुन त्या रूपास फुलांनी मोहित होउन जावे,
रोमांचित दर्पणही त्याच्या धुंदीने हरखावे
सौंदर्याला मानवंदना गगन-धरेने द्यावी
बघेल त्याच्या काळजातुनी केवळ 'हाय' निघावी
*****
अकस्मात फिरले वारे, वाटा साऱ्या घुसमटल्या
या वाटांवर नियतीने निष्पाप कळ्या कुस्करल्या
लुटून गेलो असा रंक मी, काळाचे सोसतो डंख मी
श्वासांची चढते धुंदी अन् अडखळते पाऊल ||

चंद्राची बट सावरायला हात लाभले होते
वसंतास हाकारण्यास हे ओठ उघडले होते
दु:खितांस रिझवावे यास्तव दु:ख मिळाले होते
स्वर्ग धरेवर उतरविण्या श्वासांचे इमले होते
*****
काही घडले नाही हातुन, दिन अस्ताला जाई
गूढ वावटळ मनोरथांचे विश्वच उधळुन देई
भयकंपित मी थरथर कापत, डोळ्यांमधले पाणी लपवत
बघत राहिलो कफन ओढली थडगी शांत, मलूल ||

प्रसन्न किरणापरी कुणी सौभाग्यकांक्षिणी नटली
झडे चौघडा, नृत्य रंगले, सुरांत सनई सजली
'पहा चालली वधू सासरी' दिशांत वार्ता घुमली
आणि निरोपाच्या अश्रूंनी अवघी नगरी भिजली
*****
क्षणार्धात झाला कोठुनसा शस्त्राघात विषारी
कुंकुमतिलक पुसटला, झाले जीर्ण वस्त्र जरतारी
मी अलिप्तसा, अंतर राखत; दूरदूरची जशी इमारत
घेत राहिलो मेणा धरल्या भोयांची चाहूल ||

निघून गेले कधीच तांडे, बघत राहिलो धूळ..........................

मूळ रचना : कारवां गुजर गया
मूळ रचनाकार : कवि गोपालदास 'नीरज'
स्वैर भावानुवाद : क्रांति
******************************************

मूळ रचना : कारवां गुजर गया [कवि गोपालदास नीरज]

स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से
लुट गये सिंगार सभी बाग के बबुल से
और हम खडे खडे बहार देखते रहे
कारवां गुजर गया, गुबार देखते रहे

नींद भी खुली न थी कि हाय धूप ढल गई
पांव जबतलक उठे कि जिंदगी फिसल गई
पात पात ढह गये कि शाख शाख जल गई
चाह तो निकल सकी न पर उमर निकल गई
*****
गीत अश्क बन गये, स्वप्न हो दफन गये
साथ के सभी दिये धुआँ पहन पहन गये
और हम झुके झुके मोड पर रुके रुके
उम्र के चढाव का उतार देखते रहे

क्या शबाब था कि फूल फूल प्यार कर उठा
क्या कमाल था कि देख आईना सहर उठा
इस तरफ जमीन और आसमां उधर उठा
थामकर जिगर उठा कि जो मिला नजर उठा
*****
एक दिन मगर यहां ऐसी कुछ हवा चली
लुट गई कली कली कि घुट गई गली गली
और हम लुटे लुटे वक्त से पिटे पिटे
सांस की शराब का खुमार देखते रहे

हाथ थे मिले कि जुल्फ चांद की संवार दूं
होंठ थे खुले कि हर बहार को पुकार दूं
दर्द था दिया गया कि हर दुखी को प्यार दूं
और सांस यूं कि स्वर्ग भूमिपर उतार दूं
*****
हो सका न कुछ मगर, शाम बन गई सहर
वो उठी लहर कि ढह गये किले बिखर बिखर
और हम डरे डरे, नीर नैन में भरे
ओढकर कफन पडे मजार देखते रहे

मांग भर चली कि एक जब नई नई किरन
ढोलकें धुमक उठी, ठुमक उठे चरन चरन
शोर मच गया कि लो चली दुल्हन, चली दुल्हन
गांव सब उमड पडा, बहक उठे नयन नयन
*****
पर तभी जहरभरी गाज एक वह गिरी
पुछ गया सिंदूर, तार तार हुई चुनरी
और हम अजानसे, दूर के मकान से
पालकी लिये हुए कहार देखते रहे

Saturday, February 9, 2013

अब्जाधीश

घावांना सोसून घडेनच नक्की
माझ्यासाठी मी बहरेनच नक्की

चंदन आहे, झिजते अन् दरवळते
गंधाच्या रूपात उरेनच नक्की

या जन्मी जगण्याचे नाटक केले,
पुढल्या जन्मी मात्र जगेनच नक्की !

उल्का होणे माझे प्राक्तन नाही
अढळपदाला पात्र ठरेनच नक्की

आहे जरि तर्काच्याही पलिकडली,
आज-उद्या मी मला कळेनच नक्की !

सव्वा लाख मुठीतच झाकत आले,
आता अब्जाधीश असेनच नक्की !

Monday, February 4, 2013

चाकोरी

कक्षा वाढत जाते, फिरणे संपत नाही 
चाकोरी सोडावी इतकी हिंमत नाही !

खोटी आश्वासने तुझी अन् वृथा वल्गना,
सोड सुखा रे, बरी तुझ्याशी संगत नाही 

दुर्लभ होते जे जे, त्याची फोल अपेक्षा,
जे जे लाभत गेले, त्याची किंमत नाही 

अलिप्त, परके, विभक्त होणे पचनी पडले
हल्ली मी माझ्यात जराही गुंतत नाही

जाता-येता श्वास तेवढे मोजत गेले,
इतके सोपे जगणे म्हणजे गंमत नाही !

वाटा फुटतिल जिथे, तिथे मनमुक्त फिरावे,
मुक्कामाचा प्रवास कधिही रंगत नाही !