Sunday, May 31, 2009

डाव

पुरा जो होणार नाही, डाव असा मांडू नको
पापण्यांच्या शिंपीतले मोती कुठे सांडू नको

जिवाभावाचे अनाम नाते कधी तोडू नको
अर्ध्या वाटेवर मला वादळात सोडू नको

आर्त, उदास, हळवे सूर पुन्हा छेडू नको
रानभरी वा-यापरी सांजवेळी वेढू नको

झाले गेले विसर ते, त्याचा माग काढू नको
ओल्या पदरात माझ्या दु:ख आता वाढू नको

जोगवा

नक्षत्रांच्या गावातून कुणी सांगावा धाडला?
जीव पाखरू होऊन माझा आभाळा भिडला

वैशाखातल्या दुपारी कुणी गारवा पेरला?
मनी फुलोरा फुलला, रानी मयूर भारला

आला मैफलीला रंग, ताल सुराला भेटला,
अंतरंगी आनंदाचा असा उमाळा दाटला

मोतीपोवळे माळून दारी प्राजक्त डोलला
हळुवार गूज काही वारा कानात बोलला

झाकोळल्या नजरेला दिसे प्रकाश आतला
माझ्या फाटक्या झोळीत असा जोगवा घातला!

मी

मुक्त तरीही बंधनात मी
फुलाफुलाच्या स्पंदनात मी
मंद ज्योत ती मीच तेवती
विरघळणा-या चंदनात मी
कधि मीरेची एकतारि मी
कधि राधेच्या मंथनात मी
वससी माझ्या अंतरात तू
अविरत तुझिया चिंतनात मी
कळी पाकळी फुलवित जाते
जणु भ्रमराच्या गुंजनात मी
पारिजातकापरी फुलविले
सौख्य तुझ्या रे अंगणात मी
तुझ्या प्रीतिचा चंद्र जडविला
नक्षत्रांच्या कोंदणात मी
भाग्यदैवता तुलाच जपले
भाळावरच्या गोंदणात मी

Saturday, May 30, 2009

रंग मेंदिचा

रंग मेंदिचा हातावरती अजून खुलतो कधी कधी
शारदरात्री तोल मनाचा अजून ढळतो कधी कधी

हिरमुसलेली जुई-सायली कधी अचानक मोहरते
निशिगंधाचा धुंद ताटवा अजून फुलतो कधी कधी

खिन्न मनाच्या मैफलीत या आर्त विराणी गाताना
आनंदाचा सूर अचानक अजून जुळतो कधी कधी

वठलेल्या निष्पर्ण मनाच्या थरथरत्या फांदीवरती
आशेचा हलका हिंदोळा अजून झुलतो कधी कधी

कधी अचानक हसता हसता डोळे भरती अन् झरती
फुले वेचता चुकार काटा अजून सलतो कधी कधी

तृप्त मनाच्या नभी क्षणांतच दाटुन येते मळभ कसे?
अवचित हळवा भास तुझा का अजून छळतो कधी कधी?

आठवणींचे कढ

सगळेच चेहरे कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत राहिले
आठवणींचे कढ मनात पुन्हा पुन्हा दाटत राहिले

उदास मन, हळव्या भावना, घुसमटणा-या तीव्र वेदना,
कुणाकुणाला आधार देऊ? आभाळच फाटत राहिले

नाव मिटले, गाव सुटले, अस्तित्वाचे धागे तुटले
ओळखीचे रस्ते तरी वळणावळणावर भेटत राहिले

वसंतातल्या बहरानेच कळी कळी जळून गेली
वैशाख वणवा भडकावा, तसे मन पेटत राहिले

निस्तेज पहाट, भयाण दुपार, उदास संध्याकाळ सरली
गूढ़, गर्द काळोखाचे डोह मनात साठत राहिले

का नात्यांचा रंग विटला? गोफ तुटला, पीळ सुटला
मनामनांना जोडणारे रेशिमधागे तुटत राहिले

किती वाटा बदलल्या, किती मार्ग तुडवून झाले,
इतकी दूर आले, तरी दु:ख मला गाठत राहिले

Wednesday, May 27, 2009

धागे

माझे नि तुझे धागे जुळले कधीच नव्हते
रे जीवना तुला हे कळले कधीच नव्हते

येता वसंत दारी, फुलले पुन्हा निखारे
ग्रीष्मातही अशी मी जळले कधीच नव्हते

मी सोसते अजूनी छळ का तुझ्या व्यथांचा?
माझ्या विवंचनांनी छळले कधीच नव्हते

दारी तुझ्या कशा या पाऊलखुणा माझ्या?
पाऊल त्या दिशेला वळले कधीच नव्हते

डोहात काळजाच्या मी दडविले उसासे
माझे अबोल अश्रू ढळले कधीच नव्हते

मी कालच्या चुकांची चिंता करू कशाला?
ते भोग प्राक्तनाचे टळले कधीच नव्हते

Tuesday, May 26, 2009

मुक्ती

रोमरोमात जागली तुझ्या मुरलीची साद
दाही दिशा ओलांडून घुमे आज अंतर्नाद

भल्या पहाटे प्राणांत जणु काकडा पेटला
तिन्ही जगांचा नियंता अंतरंगात भेटला

आसावल्या पावलांना दिसे वाट पंढरीची
सावळ्याच्या भेटीसाठी नेते ओढ़ अंतरीची

द्रौपदीच्या दारी उभा चराचराचा हा स्वामी
भुकेल्याची तृप्ति इथे जाणवते अंतर्यामी

दूर भौतिकापासून, भक्तिमार्गाला निघाले
अंतर्बाह्य बदलले, मन विश्वरूप झाले

लक्ष चौ-यांशीचे फेरे किती काळ आता साहू?
मुक्ती देई मायबापा, असा अंत नको पाहू

भाव

तुझ्या डोळ्यांतले जे भाव होते
कुणाच्या काळजावर घाव होते?

इथे काटेच आता सोबतीला,
[फुलांसाठी कधी हे गाव होते ]

तुझा रुसवा, तुझे फसवे उसासे,
मला रोखायचे ते डाव होते

तुझ्या ओठांत माझे गीत होते,
तुझ्या गीतात माझे नाव होते

कधी सत्यात ते दिसलेच नाही
तुझ्या स्वप्नातले जे गाव होते

मनापासून मी होते तुझी का?
अखेरीला मनी हे भाव होते!

वसंत

आज माझ्या बागेमध्ये झाली काय नवलाई?
चोरपावलांनी जणु कोणी हलकेच येई
अबोलीच्या मनी काही भाव लाजरे, अव्यक्त
गुलमोहराच्या कानी गूज सांगतो प्राजक्त
मनमोकळ्या सुरात गाई बकुळीचा गंध
संगे रातराणी डोले, ताल देतो निशिगंध
जाईच्या मांडवाखाली नाजुक फुलांचा सडा
धुंद गंध उधळतो पानापानात केवडा
काट्यांवर उभी तरी हसे गुलाबाची कळी
जसे गुपित खुलावे, तशी फुलते पाकळी
गगनजाई करते गुजगोष्टी आकाशाशी
पायतळी पहुडल्या इवल्या फुलांच्या राशी
मोग-याची फुले काही कुजबुजली कानात
लाजून का चाफेकळी अशी दडली पानात?
पळसाने केशराचा गालिचा हा सजवला
रंग, गंधाची बहार घेऊन वसंत आला

Sunday, May 24, 2009

मन मनाला ना कळे

मन मृदु नवनीत, मन अभेद्य कातळ
कधि भरली घागर, कधि रिकामी ओंजळ

मन वठलेले झाड, मन फुलण्याचा वसा
कुठे मोकळी चौकट, कुठे बोलका आरसा

मन अक्राळविक्राळ जसा अदृष्टाचा भास
मन नाजूकसाजूक जसा चांदण्याचा श्वास

मन दूर दूर कधी, कधि अवतीभवती
मन कोवळी पहाट, मन सांज मावळती


मन काया की सावली? मन जाणत्याचे पिसे,
मन ओळखले कुणी? कोण जाणे मन कसे?

मन हिरवी धरित्री, मन आभाळ सावळे
मन अगम्य, अबोध; मन मनाला ना कळे

करुणा कर

सांब सदाशिव शंकर नीलकंठ गौरीहर
हे उमापती महेश भूतनाथ गिरिजावर

करी धारिसि त्रिशुल डमरु हे नटवर शशिशेखर
अंगी चिताभस्म लेप सर्पमाळ व्याघ्राम्बर

मदन दग्ध करिसि तूच हे त्रिनेत्र नंदीश्वर
रौद्र तुझे तांडव ते भीषण अन् प्रलयंकर

शंभो कैलासनाथ भालचंद्र गंगाधर
तूच सत्य, शिव, सुंदर करुणाकर करुणा कर

मनासारखे

हसू खुलू दे मनासारखे
जरा घडू दे मनासारखे

तुझी दिठी केसांत माळुनी
मला सजू दे मनासारखे

मुठीत बंधू नको कळीला
तिला फुलू दे मनासारखे

खुळे तुझ्या स्वप्नात जागते
मना करू दे मनासारखे

दंवात न्हाते पहाट ओली
धुके झरू दे मनासारखे

सुरांसवे माझ्या काव्याचे
दुवे जुळू दे मनासारखे

पसायदानी मागे ज्ञाना
जनां मिळू दे मनासारखे

वारसा

घाव घालुन मीठ त्यावर चोळण्याचा
हाच होता रोख त्याच्या बोलण्याचा

क्रूरतेला राहिली सीमा न काही,
छंद त्याला सावजाशी खेळण्याचा

मंदिराची देणगी ही लाच 'त्या' ला,
की तराजू पाप पुण्ये तोलण्याचा?

जीवघेणा खेळ आता सोड वेड्या,
कोवळया, ताज्या फुलांना जाळण्याचा

उंच जाताना न होते भान याचे ,
झोकही जाईल फिरत्या पाळण्याचा

"आज मी कामात आहे, तू उद्या ये"
रोजचा त्याचा बहाणा टाळण्याचा

तू नको ध्यानात घेऊ, मीच घेते
वारसा खाणाखुणा सांभाळण्याचा

Saturday, May 23, 2009

दास

या मनास लागावा अनवरत ध्यास तुझा
आप, तेज, वायु, धरा, सा-यांतच भास तुझा

तूच मनी, तू नयनी, प्राण तुझे, श्वास तुझा
मुखी राहो नाम तुझे, ध्यानी मनी वास तुझा

अवघड ही वाट तरी आसरा जिवास तुझा
कानी घुमे मुरलीचा नाद आसपास तुझा

नाना रूपांत दिसे आगळा विलास तुझा
मनमोहन, यदुनंदन यमुनातटी रास तुझा

तारशील भवसागरी, मजसी विश्वास तुझा
देई विसावा चरणी, प्रभु मी रे दास तुझा

एका बेसावध क्षणी

एका बेसावध क्षणी वचनात गुंतून मी
तुझ्या संगतीने आले विश्व माझे त्यागून मी

तुझ्या सोबतीचा किती गर्व, अभिमान होता,
महाराज्ञी होते जशी, जग सारे जिंकून मी

चार भिंती, छत, दारे यांना घरपण दिले
चांदण्यांचे कवडसे अंगणात शिंपून मी

चित्र अर्धेच ठेवून माझे कुंचले टाकले
रंग माझे विसरले, तुझ्या रंगी रंगून मी

नाही घेतला मी ठाव, नाही मोजली मी खोली,
तुझ्या अस्तित्वात असे दिले मला झोकून मी

तुझी प्रगती, विकास, तुझा चढता आलेख,
तुझ्या कोडकौतुकात नित्य गेले गुंगून मी

तुझ्या यशाचे मंदीर, शिखराचा तूच धनी
नामदेवाची पायरी, तशी दारी थांबून मी

माझे आयुष्य परीघ, तूच एक केंद्रबिंदू
तुझ्याभोवती फिरले मला हुलकावून मी

एका बेसावध क्षणी तुला कळणार नाही
कसे झाले, काय झाले? कधी गेले संपून मी!

सल

दारी फुलांची पालखी, चित्त काट्यांत गुंतले 
गंधवेड्या गुलाबाचे पाय काट्यांत गुंतले 

किनाऱ्याच्या भोवतीच नाव फिरे दिशाहीन 
तिला दिसेना किनारा, दैव काट्यांत गुंतले 

वाटेवर आसुसल्या प्राजक्ताच्या पायघड्या 
गेले जाणून दुरून, मीच काट्यांत गुंतले 

रोज फुलांच्या भ्रमात काटे गुंफले, माळले
गंध त्यागला फुलांचा, श्वास काट्यांत गुंतले

अल्पजीवी आयुष्याचा शाप फुलांना, कळ्यांना
काटे जन्माचे सांगाती, प्राण काट्यांत गुंतले

अजुनही पापण्यांत सल हिरवे काट्यांचे
कसे सोडवावे पाश? स्वप्न काट्यांत गुंतले 

Friday, May 22, 2009

आज

नक्कीच काहीतरी चुकतंय आज
कशानं हे मन वेडं दुखतंय आज ?


कधीच्या सुचलेल्या दोनच ओळी
पिंगा घालतात भलत्याच वेळी
अनावर रात्री चांदण्याची खेळी
स्रृजनाचं सुख सुद्धा खुपतंय आज !


मनातलं गाणंही ओठांवर नाही
सुरांचं गाव कुठे दूरवर राही
उजाड माळ का वाट माझी पाही ?
आभाळही पापण्यांत झुकतंय आज


उदास झाडांची गळतात पानं
निस्तेज चंद्राचं वितळून जाणं
धुकं, जसं दुखणं जुनं पुराणं
उफाळून पुन्हा का सलतंय आज ?

किमया

सांग ही किमया कशाची, मी नवी, जग हे नवे

सांगती माझी कहाणी पाखरांचे हे थवे

पाहते मी रूप माझे चांदण्यांच्या दर्पणी

कोण उधळित गंध फुलवी संचिताच्या अंगणी
सप्तरंगी इंद्रधनुचे रंगगहिरे ताटवे ?

शोधले मी आज माझे हरवलेले सूरही
आणि वा-याने सुरांना बांधले नूपूरही
गीत माझे मोरपंखी भावनांना जागवे

मीच गाणे कोकिळेचे, चातकाची मी तृषा
मीच कातर सांज हळवी, मी उषा अन् मी निशा
ज्योत माझ्या अंतरीची वाट मजला दाखवे

अंत

फुलत्या क्षणी फुलणे ना जमले
सुकताना ही खंत नको
गंधित होउन बहरून जावे
पाचोळ्यापरी अंत नको

जगणे अवघड झाले तेव्हा
दिला सुरांनी जन्म नवा
जन्मांतरी हे सूर भिनावे
नुसता कोकिळकंठ नको

रंग रूप रस गंध साठवित
फुलाफुलावर लहरत जावे
फूलपाखरू जीवन व्हावे
कोशातिल सुरवंट नको

क्षणाक्षणाला कणाकणातुन
उसळावे चैतन्य अनोखे
खळाळते आयुष्य असावे
गती कधीही संथ नको

अद्भुत काही असे घडावे
असणे नसणे सार्थ ठरावे
रडतच आलो रडवुन गेलो
इतका साधा अंत नको