Sunday, April 5, 2009

समर्पण

समर्पणाची आस उराशी, आतुर सरिता आली धावत
ऐकशील का कधी सागरा अंतरिचा हा नाद अनाहत?

लाटांचे हे तांडव आवर, या बेभान मनाला सावर
व्यापुन राही कणाकणाला, तुझ्या भेटिची ओढ़ अनावर

पर्वतरांगा, कडेकपारी, डोंगर, कुरणे, दरिखो-यांतुन
उसळत आले आवर्तातुन, कधि बांधांच्या चाको-यातुन

कधी सोशिली ग्रीष्म काहिली, कधि शरदाची कौमुदि शीतल
स्वातीचे कधि झेलित मोती, बहर वसंताचा कधि चंचल

एकरूप होईन तुझ्याशी, नको दुरावा, नकोच अंतर
सामावुन घे अंतरात मज, वाहुन थकले मीहि निरंतर

No comments:

Post a Comment