Monday, June 1, 2009

तुझ्यासवे

अबोल सांज बोलते तुझ्यासवे
उदास रात डोलते तुझ्यासवे

तुझ्याच आसवांत मी भिजून रे
तुझेच दु:ख झेलते तुझ्यासवे

स्वर्ग सात पावलांत लाभला
सदैव वाट चालते तुझ्यासवे

मनात चांदणे फुलून बहरते
फुलांत चंद्र माळते तुझ्यासवे

झिजून चंदनास गंध येतसे
अखंड धूप जाळते तुझ्यासवे

तुझ्या सुरांत शब्द गुंफुनी नवे,
सुरेल गीत छेडते तुझ्यासवे

तुझेच बिंब चंद्रपुनव होउनी
तनामनास वेढते तुझ्यासवे

तुझी आठवण

मनात भरते एक रितेपण
संध्याकाळी तुझी आठवण

तुझी धावती भेट अचानक,
मोहरलेले ते अपुरे क्षण

वरवरचे ते कुशल सांगणे,
उदास तूही, उदास मी पण

गूज मनीचे मनी राहिले,
कसले ते अधुरे संभाषण!

निरोप घेता मळभ दाटले,
धूसरले क्षितिजाचे अंगण

अवचित येणे, नकळत जाणे,
असे, जसे वळवाचे शिंपण

तुझ्याचसाठी कातरवेळी
अजुन बरसतो नयनी श्रावण

हळव्या रात्री चंद्र जागतो
तुझ्या स्मृतीचे होउन दर्पण

रिता गाभारा

बुडत्याला काडीचाही आता सहारा कशाला?
मंदिरात देव नाही, रिता गाभारा कशाला?

कान्हा जाई मथुरेला, झाले गोकुळ पोरके
मन सैरभैर झाले खुळ्या पाखरासारखे
प्राण जाता कुडीचा हा उरे पसारा कशाला?

निराकार, निर्गुण हा जरी अंतरात वसे
तरी सगुण रूपाचे मना लागलेले पिसे
तुझ्याविना नौकेला या हवा किनारा कशाला?


तुझ्या आधारवृक्षाचा हवा उन्हात विसावा
तुझ्या कृपाप्रसादाचा घन सदा बरसावा
व्याकुळल्या जीवाला या बाकी उतारा कशाला?