Thursday, August 9, 2012

नको जाऊस

पाचोळा होऊन जीव 
सोसतो हीव
सुसाटत वारा
उडवून नेतसे दूर 
उरी काहूर 
कुठे न सहारा 

मन सांद्र रान दाटले 
झरे आटले
खिन्न नेत्रांत
कंठाशी व्याकुळ प्राण
शुद्ध ना त्राण
क्लांत गात्रांत

चिमणे घरटे उधळून
चूड लावून
सरे वैशाख
आषाढ-श्रावणी सरी
रडुन कधितरी
भिजविती राख

आभाळ भरुन ओथंब
पुसटसे थेंब
दूरवर झरती
शमली ना थेंबतहान
नद्या बेभान
सागरा भरती

ठेवून तुला गाफील
भिडुन जाईल
मुका पाउस
रे, सावर वेड्या जिवा
मालवुन दिवा
नको जाऊस  

No comments:

Post a Comment