Sunday, November 14, 2010

म्हटले होते

आषाढघनांचे गाणे वेचावे म्हटले होते
रंध्रांत सुरांचे नाते पेरावे म्हटले होते

जो माझ्या वाटेवरती पेरून चांदणे गेला,
त्या लोभस आनंदाला भेटावे म्हटले होते

एकाकी अभिमन्यू मी, लढले पण अंती हरले
नियतीच्या चक्रव्युहाला भेदावे म्हटले होते

हातात उरे इतकासा  चतकोर फाटका तुकडा,
आभाळ तुझे सवडीने झेलावे म्हटले होते

मी ऐन क्षणी चुकले अन् सोंगट्या पटावर थिजल्या
हा डाव जिंकण्यासाठी खेळावे म्हटले होते

1 comment: