Wednesday, May 27, 2009

धागे

माझे नि तुझे धागे जुळले कधीच नव्हते
रे जीवना तुला हे कळले कधीच नव्हते

येता वसंत दारी, फुलले पुन्हा निखारे
ग्रीष्मातही अशी मी जळले कधीच नव्हते

मी सोसते अजूनी छळ का तुझ्या व्यथांचा?
माझ्या विवंचनांनी छळले कधीच नव्हते

दारी तुझ्या कशा या पाऊलखुणा माझ्या?
पाऊल त्या दिशेला वळले कधीच नव्हते

डोहात काळजाच्या मी दडविले उसासे
माझे अबोल अश्रू ढळले कधीच नव्हते

मी कालच्या चुकांची चिंता करू कशाला?
ते भोग प्राक्तनाचे टळले कधीच नव्हते

No comments:

Post a Comment