Saturday, May 30, 2009

आठवणींचे कढ

सगळेच चेहरे कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत राहिले
आठवणींचे कढ मनात पुन्हा पुन्हा दाटत राहिले

उदास मन, हळव्या भावना, घुसमटणा-या तीव्र वेदना,
कुणाकुणाला आधार देऊ? आभाळच फाटत राहिले

नाव मिटले, गाव सुटले, अस्तित्वाचे धागे तुटले
ओळखीचे रस्ते तरी वळणावळणावर भेटत राहिले

वसंतातल्या बहरानेच कळी कळी जळून गेली
वैशाख वणवा भडकावा, तसे मन पेटत राहिले

निस्तेज पहाट, भयाण दुपार, उदास संध्याकाळ सरली
गूढ़, गर्द काळोखाचे डोह मनात साठत राहिले

का नात्यांचा रंग विटला? गोफ तुटला, पीळ सुटला
मनामनांना जोडणारे रेशिमधागे तुटत राहिले

किती वाटा बदलल्या, किती मार्ग तुडवून झाले,
इतकी दूर आले, तरी दु:ख मला गाठत राहिले

No comments:

Post a Comment