Saturday, November 17, 2012

अलख

हा अलख कुणा जोग्याचा
ही गहन कुणाची वाणी
प्राणांच्या कंठी रुजली
संध्यापर्वाची गाणी

झाकोळुन नभ गंगेच्या
पाण्यात उतरले थोडे
क्षितिजाच्या पार निघाले
अन् सूर्यरथाचे घोडे

या मूक उदास जलावर
धूसर वलये वाटोळी
रेखाटत बसली कुठल्या
कवितेच्या अनवट ओळी?

ज्या सांद्र वनातुन घुमले
अस्वस्थ क्षणांचे पावे
ते वन सोडून निघाले
अज्ञात दिशेला रावे

ढळत्या सांजेच्या पदरी
अस्फुटसा लुकलुक तारा
परतून चालला जोगी
अन् अलख घुमवितो वारा

 [मिसळपाव.कॉम या संकेतस्थळाच्या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली माझी कविता]

No comments:

Post a Comment