Saturday, December 8, 2012

भय

निष्पर्ण, रिते सांगाडे
सोसते भुई पाचोळा
भणभणता वारा सांगे
'आल्या परतीच्या वेळा'

करपली कधी हिरवाई,
धुरकटे निळाई केव्हा?
भडकतो सूर्य ज्वाळांनी,
उसळतो दिशांतुन लाव्हा

तडफडणाऱ्या वाटांनी
पायांना जखमा केल्या
फिरतात सावल्या काळ्या
स्मरणांच्या हिरमुसलेल्या

भय जगण्याचे, मरणाचे
भय असण्याचे-नसण्याचे
चकव्यातुन सुटता सुटता
दलदलीमधे फसण्याचे

भयग्रस्त, विषण्ण मना रे,
भयमुक्त कसे मी व्हावे?
नभ काजळता क्षितिजाशी,
सरणाचे पाय धरावे 

No comments:

Post a Comment